चंद्रपूर :- केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे थोर समाजसुधारक, ख्यातनाम पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते होते असे प्रतिपादन उपायुक्त शेषराव टाले यांनी केले. चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर संगीता राजेंद्र खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव व स्थायी समिती सभापती मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपायुक्त शेषराव टाले, सहाय्यक आयुक्त क्षितिज जांभूळकर, डॉ. नरेंद्र जनबंधू, गणेश राखुंडे, मनीषा नैताम, ग्रेस नगरकर, शुभम तुंडूलवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपायुक्त यांनी प्रबोधनकार ठाकरे हे लोकहितवादी नेते, ख्यातनाम लेखक व इतिहास संशोधक होते असे सांगितले.
तसेच त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रचार प्रसार केला. अनेक साहित्य संपदांची निर्मिती केली. अंधश्रद्धा, अन्याय्य रूढींना सतत विरोध केला. त्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती या तीन मार्गाचा अवलंब केला असे सांगून संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही उपायुक्त शेषराव टाले म्हणाले.





