कामठी :- राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कामठी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतिचा पाच वर्षांचा कार्यकाळ 11 फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे त्यामुळे मुदत संपणाऱ्या लोणखैरी, भामेवाडा, महालगाव,पावंगाव,घोरपड,कोराडी,खेडी,केसोरी, टेमसना या 9 ग्रामपंचायतीवर प्रशासक राज येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करीत असलेल्या भावी सरपंच,उपससरपंच व इच्छुक उमेदवारांना किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.कार्यकाळ संपल्याने विद्यमान सरपंच व सदस्यांची सत्ता समाप्त होणार असून गावगाड्याची धुरा आता थेट शासकीय अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे.अचानक प्रशासक राज होणार असल्याच्या चर्चेने या सर्व इच्छुकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.निवडणुका लांबल्यामुळे राजकीय गणिते बिघडली असून अनेक गटांना आता आपली रणनीती नव्याने आखावी लागणार आहे.आता पुढील काही महिने ग्रामपंचायतिचा करभार प्रशासका मार्फत चालवला जाणार आहे.विकास कामांची गती,निर्णयप्रक्रिया आणि लोकप्रतीनिधींचा सहभाग याबाबत ग्रामीण भागात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत .एकंदारितच ग्रामपंचायत राजकारणाला तातपूर्ती विश्रांती मिळाली आहे.




