Ø ३८ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित
Ø १५ परवाने कायमस्वरूपी रद्द
Ø कृषी विभागाची धडक कारवाई मोहीम
यवतमाळ :- जिल्ह्यात सध्या पेरणीची तयारी सुरू असून शेतकऱ्यांची खते, बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट मोडवर आला असून कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके विक्री केंद्रात अनियमितता केल्यामुळे एकूण ३८ कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित व १५ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यवतमाळ, वणी, व कळंब तालुक्यात अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री प्रकरणी एकूण ३ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत कापूस बियाण्यांचे ६३१ पॅकेट व तीन वाहने जप्त करण्यात आले असून एकूण २२.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे अनधिकृत बोगस रासायनिक खत विक्री प्रकरणी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून ७०० बॅग व १ वाहन जप्त करण्यात आले त्याचे एकूण जप्त साठ्याचे मूल्य १८ लाख रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली.
भरारी पथके कार्यरत
कृषी निविष्ठा नियंत्रणासाठी जिल्ह्यात एकूण ३६ गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत व एक जिल्हास्तरीय भरारी पथक कार्यरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डायल 9403229991
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा उपलब्धतेबाबत शेतकरी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून तक्रारीसाठी 9403229991 हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी मदत व तक्रारींसाठी या हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी केले.