– राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन
नागपूर :- दिल्ली येथील जंतर- मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन, नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधान चौक येथे भव्य व शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ५०० हून अधिक विद्यार्थी, पालक, महिला, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे आणि त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे नागपूर जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांवरील कारवाईची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात भीम आर्मी भारत एकता मिशनच्या नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा नेहा राऊत, जिल्हा महिला वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. वंदना इंगळे, शीला वासनिक, जिल्हा सचिव राहुल जगताप, उपाध्यक्ष संघरत्न गेडाम, आकाश गजभिये, माया पाटील, शेखर उके, शखिल मदारी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पार पडले.





