Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन व्हावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

– नामशेष होत असलेल्या कलांचे जतन करण्यासाठी 

– विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची राज्यपालांची सूचना

मुंबई :- आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग विविध क्षेत्रात मोठी भूमिका बजावणार आहे. त्याचे लाभ जसे अनेक आहेत तसेच त्यातून अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिक संवेदनशील बनवण्याबाबत चिंतन झाले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती वाढवून समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना घेऊन समावेशी विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

नाविन्यपूर्ण कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी मुंबई येथील ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीने सुरु केलेल्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन’चे उदघाटन  राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या बीकेसी येथील शैक्षणिक संकुलात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ओ पी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीने ‘सिरील श्रॉफ सेन्टर ऑफ एआय, लॉ अँड रेग्युलेशन’ यांच्या सहकार्याने आयोजित ‘गव्हर्निंग एआय : कायदा, तंत्रज्ञान व समाज’ या विषयावरील चर्चासत्राचे देखील उदघाटन राज्यपालांनी केले.

तंत्रज्ञान उपलब्ध असणे, परंतु ठोस उद्दिष्ट समोर नसणे; किंवा विज्ञान उपलब्ध असणे, परंतु त्याला मानवी मूल्यांची जोड नसणे धोक्याचे असते, असे सांगून कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करताना दया, अनुकंपा व  सहानुभूतीचा त्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.   या दृष्टीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दुर्बल घटकांबद्दल अनुकंपा सहानुभूती बाणवली पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान’ या घोषणेला ‘जय किसान’ची घोषणेची जोड दिली होती. त्यानंतर पंतप्रधान वाजपेयी यांनी आपल्या काळात त्याला ‘जय विज्ञान’ची जोड दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या घोषणेला ‘जय अनुसंधान’ची जोड दिली असे सांगून सध्याचे युग हे विज्ञान व नवोन्मेषाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘विकसित भारत’ संज्ञेचा अर्थ आर्थिक दृष्ट्या संपन्न भारत इतका मर्यादित नाही असे सांगून ‘विकसित भारत’ म्हणजे ‘सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामय’ हा आहे व त्याकरिता प्रत्येक व्यक्तीचा विकास होणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

नामशेष होत असलेल्या कलांचे जतन व्हावे

आधुनिकीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर यंत्रनिर्मित वस्तूंचा वापर  वाढल्यामुळे आज  जगभरातील हजारो पारंपरिक कला प्रकार आणि हस्तकला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.  एक कला जरी नामशेष झाली तरी आपण आपली सांस्कृतिक ओळख गमावतो. त्यामुळे नामशेष होत असलेल्या कलांचे जतन व संवर्धन झाले पाहिजे व त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेतला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

एखादी दुर्मिळ कला वाचवणे म्हणजे तिला संग्रहालयात बंदिस्त  करणे असे नसून तिला नवसंजीवनी देणे होय असे राज्यपालांनी सांगितले. या कार्यात ॲटलास कौशल्य विद्यापीठाने देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठातर्फे प्रकाशित एआय गव्हर्नन्स अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

ॲटलास स्किलटेक विद्यापीठाच्या संस्थापिका डॉ इंदू शहानी यांनी प्रास्ताविक केले तर ओ.पी. जिंदल ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरु सी राज कुमार यांनी ‘गव्हर्निंग एआय’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राची  भूमिका विशद केली.

सुरुवातीला राज्यपालांनी विद्यापीठाच्या नाविन्यता केंद्राला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांचेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रयोगांची माहिती घेतली.

कार्यक्रमाला  ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ शहानी, कुलगुरु डॉ राजन वेळूकर, सिरील अमरचंद मंगलदास कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार सिरील श्रॉफ, अपग्रॅडचे अध्यक्ष रॉनी स्क्रूवाला, विद्यापीठाचे रजिस्ट्रार पराग अमीन, अध्यापक, निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.