स्वाती सुरंगळीकर यांचे उद्गार
जयश्री दाणी यांच्या सायंवळ चे थाटात प्रकाशन
नागपूर, ११ : हातात घेऊन झटकन वाचून टाकावा असा हा काव्यसंग्रह नाही. सावकाश वाचत, काही ओळींशी अडखळत, अंतर्मुख होत थांबत, डोळे मिटून आपले अनुभव आठवून मग्न होत रेंगाळण्याची अतिशय मनस्वी अनुभूती हा संग्रह देतो. यात चित्रमय शैलीतील विचारांचे डंख आणि अननभूत कल्पनांचे विलक्षण पंख आहेत, असे उद्गार अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या अध्यक्ष स्वाती सुरंगळीकर यांनी येथे काढले.
एशिया बुक ऑफ आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री जयश्री दाणी यांच्या सायंवळ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या. शामलीला रिसॉर्ट येथे झालेल्या या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून पद्मगंधा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष व राष्ट्रीय चरित्रकार शुभांगी भडभडे यांची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर सिने दिग्दर्शिका माधुरी आशीरगडे, लेखिका मीनल येवले आणि वसुधा वैद्य उपस्थित होत्या. वर्णमुद्रा प्रकाशनातर्फे हा संग्रह प्रकाशित झाला आहे.
स्वाती सुरंगळीकर म्हणाल्या, सायंवळ या शब्दांसारखेच चंद्राळ व्यथा, रंगांगाची फुलं असे सुरेख लडिवाळ शब्द आपल्या मागे फिरत राहतात.
कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील दु:खवेणेशी आपण समरस होतो आणि त्याचवेळी वेगळ्या प्रतिमा व शब्दयोजनेने कमालीचे सुखावतो. शुभांगी भडभडे यांनी अध्यक्षीय भाषणात कवयित्रीला शुभेच्छा दिल्या व कालिदासाच्या मेघदूताचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. लीना निकम यांनी तर आभार प्रदर्शन सचिव संगीता वाईकर यांनी केले. याप्रसंगी धनश्री पाटील, अरुणा भोंडे, चित्रा कहाते, कल्पना वारणशीवर, प्रेमा खांडवे, अपर्णा आठल्ये, ज्योत्सना कदम, शंकर घोरसे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.




