– राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी
सातारा :- राज्यातील पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं आहे. पावसामुळे पाणी साचणं, झाडं पडणं अशा घटनाही कायम असून विविध दुर्घटनांमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. साताऱ्यातील फलटण तालुक्यातील खामगावमध्ये विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीसह प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तीचा जीव गेला. दुसरीकडे नवीन पनवेल येथे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील एका व्यक्तीचाही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दुर्दैवी घटना जळगावच्या अमळनेरमध्येही घडली असून तिथे खदाणीत बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. तर भंडाऱ्यात खेळता खेळता दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. 10 जणांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला असून खळबळ माजली आहे.
साताऱ्याती फलटण तालुक्यात खामगाव मध्ये विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरील विद्युत केबलच्या तारेला स्पर्श झाला. एकमेकांना वाचवण्याच्या नादात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन महिला दोन पुरुषांचा समावेश आहे. किसन शिंदे, सचिन शिंदे, गंगुबाई शिंदे आणि आरती शिंदे अशी मृतांची नावे असून फलटण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू आहे.




