कामठी :- नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच कामठी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद व मराठी माध्यमांच्या शाळांसमोर पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, यामुळे शिक्षण क्षेत्रासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या व खासगी शाळांकडे वाढत असल्याने जिल्हा परिषद शाळांमधील प्रवेशसंख्या कमी होत आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने शिक्षकांचे समायोजन, रिक्त पदे आणि शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य, डिजिटल वर्गखोल्या अशा सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास कमी होत चालल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण शिक्षण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी शासनाने ग्रामीण शाळांसाठी विशेष धोरण आखणे, पायाभूत सुविधा वाढविणे, गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर देणे आणि पालकांचा विश्वास पुन्हा संपादन करणे आवश्यक आहे. अन्यथा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था आणखी कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







