spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या जयघोषाने कपिल नगर दुमदुमले; प्रज्ञा बोधी येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात संपन्न

हंसराज,भंडारा :- कपिल नगर येथील प्रज्ञा बोधी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजेच ‘बुद्ध पौर्णिमा’ अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परिसरातील बौद्ध बांधव, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाचा शुभारंभ भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्व उपासक-उपासिकांनी सामूहिक बुद्ध वंदना सादर करून त्रिशरण व पंचशील ग्रहण केले. यावेळी संपूर्ण परिसर ‘बुद्धं शरणं गच्छामि’च्या मंत्रोच्चाराने आणि मंगलमय वातावरणाने भारावून गेला होता.

याप्रसंगी आयोजित सभेत मान्यवर वक्त्यांनी भगवान बुद्धांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, करुणा, बंधुता, समता आणि सत्य ही तत्त्वे आजही जगाला शांतीचा मार्ग दाखवणारी आहेत. समाजात वाढत असलेल्या तणाव आणि द्वेषाच्या पार्श्वभूमीवर बुद्धांचे विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन वक्त्यांनी केले.

धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेशना देण्यात आली. तसेच स्थानिक युवक-युवतींनी भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीते, वंदना आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.

प्रज्ञा बोधी समिती, कपिल नगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थित धम्मप्रेमींचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.