spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्ह्यात ४ शेतकरी गटांना फिरते मासळी विक्री वाहन वितरित

– ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासनाच्या विविध योजना – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ :- पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करून पूरक व्यवसायांद्वारे शेतकरी, पशुपालक, मच्छिमार बांधवांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अनेक योजना राज्य शासनाने हाती घेतल्या आहेत. त्यानुसार शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या फिरत्या वाहनांमुळे शेतकरी आपली मासळी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतील, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

राज्यातील शेतकऱ्यांचे मनोबल व जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी व पदुम विभागातर्फे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील निवडक शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासनाच्या विविध योजना राबवत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकरी गटांना मासळी विक्रीसाठी फिरते वाहन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा समावेश आहे. या वाहनांमुळे गटांना ठिकठिकाणी पोहोचून व्यवसाय वृद्धीसाठी मदत होणार आहे.

एकता शेतकरी गट, मेंढला, आदित्य मत्स्य विक्री महिला गट, वरूड, माँ जगदंबा शेतकरी गट, वाकद, साईबाबा शेतकरी गट, कोल्ही या गटांना फिरती वाहने वितरित करण्यात आली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय म. वि. जयस्वाल, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी बा. झाडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.