– वाहतूक कोंडीवर उपाय, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी धडक कारवाई; नागरिक आणि व्यापाऱ्यांना सहकार्याचे आवाहन
संदीप कांबळे, कामठी :- शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या शुक्रवारी बाजार परिसरात कामठी नगर परिषदेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग दिला आहे. रस्ते आणि फुटपाथांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली असून नागरिकांना दररोज कोंडी आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.
या मोहिमेअंतर्गत शासकीय जमीन, रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवरील बेकायदेशीर अतिक्रमण नियमानुसार हटविण्यात येत आहे. अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे वाहनचालक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे.
शहराचा विकास, सौंदर्यीकरण आणि शिस्तबद्ध नागरी व्यवस्थेसाठी अतिक्रमणमुक्त शहर ही काळाची गरज असल्याचे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या मोहिमेला यश मिळण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या या धडक कारवाईमुळे शुक्रवारी बाजार परिसरातील रस्ते आणि फुटपाथ पुन्हा मोकळे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.




