नागपूर :- नाथुराम गोडसे हिंदू महासभेने प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, सत्यकी सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेला फौजदारी मानहानीचा दावा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांशी संबंधित आहे. या प्रकरणातील मुख्य प्रश्न राहुल गांधी यांनी केलेले विधान सत्य होते की असत्य आणि त्यातून मानहानी झाली का, हा असल्याचे महासभेने स्पष्ट केले आहे.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, सत्यकी सावरकर यांच्या उलटतपासणी दरम्यान बचाव पक्षाकडून काही असे प्रश्न विचारण्यात आले, ज्यांचा मूळ खटल्याशी थेट संबंध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदमान कारागृहातील .. दया याचिका, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ऐतिहासिक वाद, तसेच तक्रारदारांच्या कुटुंबाचा इतिहास आणि कथित संबंध यांसारख्या विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महासभेच्या मते, सदर खटला हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण राजकीय किंवा सामाजिक जीवनाचे मूल्यमापन करण्यासाठी नसून, राहुल गांधी यांनी केलेल्या विशिष्ट विधानामुळे मानहानी झाली का, यावर केंद्रित आहे. त्यामुळे असंबंधित ऐतिहासिक, राजकीय किंवा कौटुंबिक मुद्द्यांवर भर दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेचे लक्ष मूळ विषयापासून विचलित होण्याची शक्यता असल्याचेही म्हटलेले आहे. तसेच, राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना आधार देणारे ठोस पुरावे सादर करणे ही बचाव पक्षाची जबाबदारी असल्याचे महासभेने नमूद केले आहे. केवळ ऐतिहासिक वादविवाद किंवा इतर मुद्द्यांची चर्चा करून मूळ आरोपांचे समर्थन होऊ शकत नाही, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले. न्यायालयीन प्रक्रियेचा उद्देश साक्षीदारांची विश्वासार्हता तपासणे आणि खटल्यातील तथ्यांची पडताळणी करणे हा असला, तरी त्याचा संबंध थेट वादग्रस्त मुद्द्याशी असणे आवश्यक असल्याचे महासभेने स्पष्ट केले आहे. खटल्याचा निकाल न्यायालयासमोर सादर होणाऱ्या पुराव्यांच्या आणि लागू असलेल्या कायद्याच्या आधारेच लागेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिये दरम्यान मूळ मुद्द्यांवरच भर देण्यात यावा आणि असंबंधित विषयांमुळे खटल्याचे स्वरूप बदलू नये, अशी मागणी नाथुराम गोडसे हिंदू महासभे संदीप काळे यांनी केली आहे.







