हंसराज भंडारा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा शहर शाखेच्या वतीने शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला. या निमित्ताने भंडारा शहराजवळील बेला येथील वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्ध माता-भगिनींना लाडू वाटप करण्यात आले व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, “राज्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजपने किंवा ‘सीधे’ गटाने कितीही मोठी आमिषे दाखवून लोकप्रतिनिधींना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला, तरी पक्षाशी नाळ जोडलेला सामान्य शिवसैनिक हा आजही आणि उद्याही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच खंबीरपणे उभा आहे.”
रेहपाडे पुढे म्हणाले की, “अशा प्रकारच्या कोणत्याही ‘ऑपरेशन’ने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला फारसा फरक पडत नाही. उलट अशा कारवायांमुळे शिवसैनिकांचे मनोबल अधिक उंचावले असून, ते अधिक जोमाने काम करून पक्ष संघटना मजबूत करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.”
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, अनिरुद्ध गाढवे, जितेंद्र सिंह तोमर, गोपीचंद गोमासे, राज वधवानी, रसिक खोब्रागडे, संतोष चांदेवार, शामराव मालखंडाळे, धनराज कुरंजेकर, अरविंद ठवकर, निलेश निमकर यांसह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







