पांढरकवडा :- पोलिसांनी गोवंश तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत दोन ट्रक जप्त केले असून ४९ गोवंशीय जनावरे मुक्त केली आहेत. या कारवाईत सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ११ मार्च रोजी नागपूरहून आदिलाबादकडे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपळखुटी बॉर्डर चेकपोस्टजवळ राष्ट्रीय महामार्ग ४४ वर नाकाबंदी करण्यात आली. सकाळी सुमारे ६.५० वाजता नागपूरकडून येणारे एमएच-४० वाय ३३८२ व एमएच-४० वाय ७७२१ क्रमांकाचे दोन टूरक थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान पहिल्या ट्रककमध्ये २५ गोवंशीय बैल जातीची जनावरे अमानुषपणे दाटीवाटीने कोंबलेली आढळून आली. त्यापैकी एक बैल मृत अवस्थेत होता. दुसऱ्या ट्रकमध्ये २४ बैल आढळले असून त्यातील दोन बैल मृत अवस्थेत होते. जनावरांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले. या कारवाईत टाटा कंपनीचे दोन ट्रक (प्रत्येकी अंदाजे २० लाख रुपये), ४९ बैल (अंदाजे १९.६० लाख रुपये) व तीन अँड्रॉईड मोबाईल असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जहर खान साहेब खान, मौसीन कुरेशी, मोहम्मद शैबाज उर्फ सोनू उर्फ मुल्ला मोहम्मद नवाब आणि मोहम्मद फिरोज (सर्व रा. नागपूर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहुजी तावरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर, विकेश ध्यावर्तीवार, गजानन पत्रे, राम राठोड, विलास जाधव, किशोर आडे, संदीप मडावी व पवन मेश्राम यांनी केली.

