spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीमेस सुरवात

– १५ जुनपर्यंत काम संपविण्याचे आयुक्तांचे सक्त निर्देश  

– नाल्यावरील अतिक्रमणांवर होणार कारवाई

चंद्रपूर :- शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या ६ मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन १० छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात करण्यात आली असुन येत्या १५ जुनपर्यंत नालेसफाईचे काम संपविण्याचे सक्त निर्देश आयुक्त अकुनुरी नरेश यांनी दिले आहेत.

शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.

शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल.

नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होत आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत व अतिरिक्त असे एकुण १२६ कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता ३ जेसीबी लावण्यात आल्या असून २ पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.कंत्राटदाराला सफाई मशीन तसेच कामगार वाढविण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले असुन वेळेत सफाई न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.