मुंबई १३ – प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांना 2018 मधील सरकारी अधिकाऱ्याला धमकावण्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा आणि 5,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, उच्च न्यायालयात अपील होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांची तुरुंगवारी टळली आहे.
2018 मध्ये राज्य सरकारच्या आयटी विभागाचे तत्कालीन संचालक व उपसचिव यांना बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महापरीक्षा पोर्टलवरील तक्रारीच्या अनुषंगाने जाब विचारण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये घेराव घातला होता. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कडूंनी टेबलवरील आयपॅड उचलून मारण्याचा प्रयत्न केला व “बघून घेईल” अशी धमकी दिली होती. या घटनेचे चित्रिकरणही झाले होते.
न्यायालयाने कडू यांच्या वर्तनावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. “कायदेशीर मार्ग टाळून अधिकाऱ्याला धमकावणे अयोग्य आहे. अधिकाऱ्यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे,” असे कोर्टाने नमूद केले.
शिक्षेवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. आयटी संचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही जाब विचारला. त्यावेळी लॅपटॉप उचलला, आणि त्यावरून माझ्याविरोधात तक्रार झाली.”




