Ø जिल्हा प्रशासनाचे यंत्रणांना निर्देश
Ø विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी
यवतमाळ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुका-२०२६ चा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत शासकीय इमारतींवर अथवा परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे लिखाण, प्रचारात्मक मजकूर, फलक तसेच राजकीय व्यक्तींचे छायाचित्र प्रदर्शित होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मंत्री, राज्यमंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
याबरोबरच “महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियम” मधील तरतुदींचे उल्लंघन होऊ नये आणि आदर्श आचारसंहितेचा भंग टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.