– धान उत्पादक शेतकरी व वनहक्क धारकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा
– राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे कडक निर्देश
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- वनहक्क पट्ट्यांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न तसेच धान खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत नुकतीच अप्पर तहसील कार्यालय, देवलापार येथे राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी बांधव आणि संबंधित अधिकारी यांना समोरासमोर बसवून प्रत्येक विषयावर खुल्या आणि स्पष्टपणे चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना कशा करता येतील, याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर खुलासा घेण्यात आला. आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी मी आणि आमचे सरकार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, हा विश्वास या निमित्ताने दिला. या बैठकीत तहसीलदार रमेश कोडपे, अप्पर तहसीलदार पुनम कदम, माजी पंचायत समिती सभापती संजय नेवारे, माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, सहाय्यक वनसंरक्षक, रामटेक गोविंद लूनचे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे, तालुका कृषी अधिकारी सुनील कोरटे, विशेष कार्य अधिकारी शिवराज पडोळे, प्रशांत सांगडे, संजय गुन्न्जनवार, शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक, युवासेना उप जिल्हाप्रमुख कमलेश शरणांगत, ग्राम पंचायत वडंबा सरपंच मुकेश दुबे, ग्राम पंचायत पिपरिया सरपंच प्रवीण उईके, ग्राम पंचायत डोंगरताल सरपंच उपेश उईके, ग्राम पंचायत लोधा सरपंच विलास उईके, उपसरपंच कट्टा विशाल वरठी, आकाश पंधरे, रोमित गुप्ता, चमन जयस्वाल, रिझवान पठाण, कुंदन वैद्य यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी २१७ शेतकरी बांधवांची धान पिकांची नोंदणी तातडीने पूर्ण करून त्यांना नियमानुसार बोनस देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. तसेच या शेतकरी बांधवांना सोलर पंप व बोअरवेल प्राधान्याने देण्यात येईल, तसेच प्रलंबित असलेल्या १९५ दाव्यांबाबत स्वतंत्र बैठक घेऊन कोणते दावे तात्काळ निकाली काढता येतील, कोणत्या प्रकरणांमध्ये अधिक कागदपत्रांची आवश्यकता आहे, याचा केस-टू-केस आढावा घेऊन नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आदिवासी व शेतकरी बांधवांना झटपट आणि ठोस दिलासा मिळावा, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असून प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे ठामपणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.




