– संत्रा उत्पादनात ५० टक्के घट आल्यामुळे शासनाला सकारात्मक अहवाल पाठवा !
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी !
मोर्शी :- विदर्भातील अमरावती जिल्ह्यात अनेक संत्रा उत्पादक दरवर्षी मृग आणि आंबिया बहार संत्रा पिकाचे उत्पादन घेतात. मात्र संत्रा पिकवणारा हा शेतकरी सलग सहाव्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे संत्रा बागांना लागलेली गळती. सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात संत्रा बागांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला असतांना संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी व त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी मोर्शी तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.
मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोर्शी तालुक्यामध्ये आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करून दिलासा द्यावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे संत्रा फळ गळतीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई मदत देण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीची दखल घेऊन आज मोर्शी वरूड तालुक्यामध्ये संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी व त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्यासाठी संत्रा आंबिया व मृग बहार फळगळ संदर्भात मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले.

मोर्शी तालुक्यात आंबिया व मृग या दोन्ही बहारात अज्ञात रोगाचे आक्रमण, संत्रा गळती, पावसाचा खंड, अतिवृष्टी, वाढलेले तापमान इत्यादी कारणामुळे आंबिया बहारात फळगळ, मृग बहारात बहार न फुटणे व फुटलेल्या बहाराची गळ होणे अशा विविध अडचणी निर्माण झाल्यामुळे सदर फळगळीमुळे संत्रा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झालेली आहे.
यावेळी मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतक-यांची आंबिया व मृग बहारासाठी दापोरी, हिवरखेड, डोंगर यावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी येथील संत्रा बागांची रेण्डमली तपासणी करून फळगळ नियंत्रणात्मक उपाय योजनांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करून फळगळीमुळे संत्रा उत्पादनात ५० टक्के पेक्षा जास्त घट झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत देणे करीता संपुर्ण सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सांगून याबाबत शासनाकडे तात्काळ ५० टक्के पेक्षा जास्त घट झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा सकारात्मक अहवाल पाठविण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ, शिवाजी कृषि महाविद्यालय व शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय यांचेशी समन्वय साधून तात्काळ सविस्तर अहवाल सादर करण्याची विनंती केली.
यावेळी संशोधकांनी मोर्शी तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून संत्रा बागांवर योग्य उपाय योजना करण्यासंदर्भात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून मोर्शी तालुक्यातील संत्रा गळतीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, कृषी पर्यवेक्षक फुले, कृषी सहाय्यक अंधारे, मनीष काळे, सुनील केचे, अभिजित कराळे, मनिष गुडधे, बंडू राऊत, पंकज भोरगडे, कांचन कुकडे नंदूभाऊ बोराळकर, सागर डगवार , दिनेश गांजरे, निलेश धुर्वे यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




