spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मृग नक्षत्राची चाहूल, पावसाची वाट – धीर सोडू नका: ना.संजय राठोड यांचे शेतक-यांना आवाहन

यवतमाळ :- मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दरवर्षी ७ जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो, पण यंदा निसर्गचक्र थोडे बदलले आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धाकधूक आहे, शेतात पेरणी रखडली आहे. ही नैसर्गिक परिस्थिती आहे, यावर आपले नियंत्रण नाही. पण धीर सोडण्याचे कारणही नाही, असा दिलासा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

मंत्री राठोड म्हणाले, “कृषी आणि निसर्ग यांचे नाते फार जुने आहे. कधी पाऊस लवकर येतो, कधी उशिरा. पण शेतकरी हा मातीचा कैवारी आहे. तो प्रत्येक संकटावर मात करतो. आजची परिस्थिती पाहता आपण पर्यावरणाचा समतोल बिघडवला आहे. त्यामुळे मान्सूनचे चक्र बदलत आहे. यावर दीर्घकालीन उपाय म्हणजे जलसंधारण आणि वृक्षलागवड.”

शेतकऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे सल्ले

1. घाईने पेरणी करू नका: मृग नक्षत्र सुरू झाले म्हणजे लगेच बियाणे टाकू नका. पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाते. हवामान खात्याचा अंदाज पाहूनच पेरणी करा.

2. ओलावा टिकवा: पेरणीपूर्वी बांधबंदिस्ती, चर काढणे यांसारखी कामे करा. जमिनीत पडणारे 2-4 थेंब पाणीही अडवा, म्हणजे ओलावा जास्त दिवस टिकेल.

3. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार: आपल्या परिसरातील तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढून तो शेतात टाका. हा गाळ म्हणजे नैसर्गिक खत आहे. यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि ओलावा धरून ठेवते.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

मंत्री राठोड यांनी सांगितले की, “मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यभर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. छोटे बंधारे, नाल्यांचे खोलीकरण-रुंदीकरण, सीसीटी यांसारख्या कामांमुळे पावसाचे प्रत्येक थेंब अडवले जात आहेत. पाऊस उशिरा जरी आला तरी आपल्याकडे साठले पाणी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.”

“नैसर्गिक चक्राशी आपण लढू शकत नाही, पण त्याला समजून घेऊन त्याच्याशी जुळवून घेऊ शकतो. शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. पाऊस येईल, पेरणी होईल आणि शिवार पुन्हा हिरवेगार होईल. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे”, असे आश्वासन मंत्री संजय राठोड यांनी दिले.

पर्यावरण वाचवू या, पाणी अडवू या 

“आज जर आपण झाडे लावली नाहीत, पाणी अडवले नाही, तर उद्या आपल्या मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड लावा आणि ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत सहभागी व्हा”, असे आवाहन मंत्री राठोड यांनी शेवटी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.