– अनुष्का पाटोळेवरील अन्यायाविरोधात सकल मातंग समाज व आधारस्तंभ फाउंडेशनचा भव्य कॅण्डल मार्च
यवतमाळ :- “अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो. मात्र आता मातंग समाज अन्याय सहन करणार नाही. हा समाज पूर्वी सर्वच क्षेत्रात अग्रेसर होता. काही काळ मागे पडला असला तरी आता संघटित होऊन संघर्षाच्या मार्गावर आहे. मातंग समाज आता कधीही मागे पडणार नाही,” असे ठाम प्रतिपादन बाळासाहेब गावंडे यांनी केले.
ते संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून निघालेल्या भव्य कॅण्डल मार्च प्रसंगी बोलत होते. हा कॅण्डल मार्च सकल मातंग समाज, यवतमाळ जिल्हा व आधारस्तंभ फाउंडेशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
अनुष्का पाटोळे हिच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हा शांततामय मोर्चा काढण्यात आला.
जागृतीचे आवाहन, समाजमनाचे प्रबोधन कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक अन्याय, अत्याचार व भेदभावाविरोधात जनजागृतीचे आवाहन केले.

सुनीता काळे म्हणाल्या,“मुक्ता साळवे यांनी ‘आम्ही धर्म नसलेली लोक आहोत’ असे सांगितले होते. मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहेत. त्यामुळे आता जागृत होणे अत्यावश्यक आहे. जसे घरात संविधान उपदेशिका ठेवतो, तसेच मुक्ता साळवे यांचा निबंधही प्रत्येक घरात असला पाहिजे.”
प्रा. संजय वानखडे, प्रा. वाघमारे, विलास काळे सर, माजी तहसीलदार माणिकराव खडसे, शेतकरी नेते पडघन, गोविंदराव वानखडे, युवा नेते योगेश धानोरकर आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत सामाजिक न्यायासाठी एकजुटीचा संदेश दिला.
“न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही” – पल्लवी इंगोले
आधारस्तंभ फाउंडेशनच्या संयोजिका पल्लवी इंगोले म्हणाल्या,“अनुष्का पाटोळे एक जरी गेली असली, तरी तिच्या न्यायासाठी लाखो अनुष्का रस्त्यावर उतरतील. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. हा लढा थांबणार नाही.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ इंगोले यांनी केले, तर भुराजी तायडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शेकडोंचा सहभाग, शांततेतून रोष व्यक्त या कॅण्डल मार्चमध्ये शेकडोच्या संख्येने महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, समाजसेवक सहभागी झाले होते.
विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.
सहभागी प्रमुख कार्यकर्ते व नागरिक :
मनोज रणखाम, पंडित वानखडे, संजय कांबळे, प्रा. यशवंत खंडारे, ज्ञानेश्वर खंडारे,अजय यंगड, सागर झोंबाडे, सागर कळणे, मेजर सचिन खंडारे,अमोल पडघन, अनिल इंगोले, सुनील हिवराळे, विना नागदिवे , प्रा.संजय नाटकर, जीवन वाघमारे, प्रफुल गवळी, सचिन लोंढे,करण केराम, सुरज लोंढे, वैशाली ससाणे, मंदा इंगोले, नीलेश इंगोले, वृषाली इंगोले,राजू गवळी, रेखा लोंढे, हेमा यंगड, संगीता यंगड आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते, तसेच वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान चौक ते शिवतीर्थपर्यंत शांततामय मार्च
हा कॅण्डल मार्च संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवतीर्थ येथे शांततेत समारोप झाला.
कॅण्डल मार्चच्या माध्यमातून समाजाने अन्यायाविरोधात आपला रोष शांततेत व्यक्त करत न्याय, समता आणि संविधान मूल्यांच्या रक्षणाचा संकल्प केला.




