खापा, वार्ताहर :- सावनेर तालुक्यातील गडमी ग्रामपंचायत अंतर्गत हेटीखेडा येथे गुरुवारी (ता.९) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात घुसून तीन शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तीनही बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून पशुपालकाचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेटीखेडा येथील जंगलू चिरकुट सोनारे यांनी नेहमीप्रमाणे शेळ्या गोठ्यात बांधून ठेवल्या होत्या.
शुक्रवारी सकाळी गोठ्यात गेल्यानंतर शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. गोठ्याच्या एका बाजूला भगदाड दिसून आल्याने बिबट्यानेच हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. यानंतर वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. पशुपालनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने पीडित जंगलू सोनारे यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, तसेच परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.




