– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काढली खरडपट्टी
मुंबई :- अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधुसंतांसह देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून होते. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे त्यांना वाटले नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसची त्यांना भीती होती. आता जनाधार गमावल्यानंतर रामरक्षा करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पक्षरक्षा करावी, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रभू रामचंद्र मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला भाजपा आणि तमाम ‘हिंदू मंदिर वही बनायेंगे’ अशा घोषणा देत होते, तेव्हा हेच उद्धव ठाकरे ‘मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवत होते. ही तुमची प्रभू रामचंद्रांची भक्ती आणि ही तुमची रामरक्षा. आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून तुम्ही प्रभू रामचंद्रांचे विचारही सोडून दिले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत ते प्रभू रामचंद्रांचे काय होणार? प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबद्दल तुम्हाला बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही. शिवाजी पार्कवरच्या सभेत तुम्ही ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो’ असेही म्हटले नव्हते, हे या देशातला हिंदू आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस विसरलेला नाही. आज तुम्ही आंदोलन करताहेत ते आंदोलन नाही तर नाटक आहे. स्वतःचा पक्ष वाचावा, स्वतःचे कुटुंब वाचवा, एव्हढाच या आंदोलनाचा हेतू आहे, अशी टीका बन यांनी केली.
प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात अपहार करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, असे ठामपणे सांगत बन म्हणाले, या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एवढेच काय तर त्या आरोपींना वकीलही मिळू नये यासाठीही सारेजण प्रयत्न करत आहेत. कारण प्रभू रामचंद्रांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात भाजपा आणि तमाम हिंदू उभे आहेत. तुम्ही मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहात. जनाधार गमावल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्र मंदिराची आठवण येत आहे.
जनाब संजय राऊत, मुंबई महापालिकेचा कारभार काय आहे, ते मुंबईकरांना माहिती आहे. 25 वर्षे तुम्ही मुंबईला लुटले. सर्वसामान्य नागरिकांना सुविधा दिल्या नाहीत. भाजपा सरकार आल्यानंतर मुंबईत कोस्टल रोड झाला, मेट्रो सुरू आहे. एवढेच काय तर मुंबईतल्या मराठी माणसांना बीडीडी चाळीसह ते आहेत त्याचठिकाणी हक्काची घरे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. पत्राचाळ घोटाळा करून मराठी माणसाला लुटणाऱ्या तुम्हाला मुंबईबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. मुंबईतील दोन्ही दुर्घटनानंतर आम्ही चार अधिकारी निलंबित केले. कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला. उद्धव ठाकरे यांच्या 25 वर्षाच्या काळात एकातरी कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला होता का याचे उत्तर संजय राऊत देतील का, असा रोखठोक सवालही बन यांनी उपस्थित केला.




