– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
मुंबई :- उबाठा गटाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे सवयीप्रमाणे याही प्रकरणात यू-टर्न घेतील. याआधीही विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी जनतेसमोर केली होती. प्रत्यक्षात सहा वर्षांची टर्म पूर्ण केली. काँग्रेससोबत कधीही जाणार नाही, अशी घोषणा करत त्यावरही यू-टर्न घेतला आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. आता राणा भीमदेवी थाटात राजीनाम्याची घोषणा करणारे उद्धव ठाकरे प्रत्यक्षात राजीनामा न देता यू-टर्न घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जनाब संजय राऊत, अवघ्या चार वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कुशीतून संजय राऊत आणि उबाठा गटाचा जन्म झाल्याने टेस्टट्यूब बेबी कोण आहे, हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतरच उबाठा गटाचा जन्म झाल्याने उबाठा गटाची सरोगेट मदर काँग्रेसच आहे. धनुष्यबाण आणि मूळ शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. या शिवसेनेला साठ वर्षे पूर्ण झाली असून तिचा वर्धापन दिन एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साजरा झाला, असे सुनावत श्री. बन पुढे म्हणाले, मूळ शिवसेनेचा डीएनए हा हिंदुत्व आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. तुमचा औरंगजेब आणि अफजलखान फॅन क्लबचा डीएनए आता पाकिस्तानधार्जिणा झाला आहे. कारण तुम्ही पाकिस्तानचा उदोउदो करता. त्यामुळे आधी तुमचा डीएनए तपासा.
कालच्या सभेत आदित्य ठाकरे यांनी उबाठा गटाचे ‘भोंगा’ म्हणून संबोधले जाणारे संजय राऊत यांना भाषण करू दिले नाही. त्या सभेत आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना पाहायला मिळाला. संजय राऊत यांनी भाषणाची आणि शिव्या देण्याची पूर्ण तयारी केली होती; परंतु आदित्य ठाकरे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की उबाठा गटाच्या मेळाव्यात भाषण करायचे नाही. त्यामुळे काल संजय राऊत यांना भाषणाची संधी मिळाली नाही. येत्या काळात आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवतील. कारण उबाठा गटाची वाताहत संजय राऊत यांच्यामुळे होत आहे. कालच्या सभेत भोंगा वाजला नाही आणि येणाऱ्या काळातही हा भोंगा म्यूट करण्याचे काम आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून केले जाईल, असे म्हणाले.
संजय राऊत हे उबाठा गटात नटरंग आणि नाच्याची भूमिका बजावत आहात. इतरांना ‘मावशी’ म्हणण्यापूर्वी आधी स्वतःचा नटरंग आणि नाचा झालाय, याकडे अधिक लक्ष द्या. उबाठा गटाचा पूर्ण तमाशा करून नटरंग आणि नाच्याची भूमिका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अतिशय चांगल्या पद्धतीने साकारत आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला नटरंग आणि नाचा म्हणून ओळख दिलीच आहे, अशा शब्दात बन यांनी फटकारले.







