– आ. भोंडेकर यांची अधिवेशनात मागणी
भंडारा :- भंडारा व पवनी तालुक्यातील ३२ गावांना दरवर्षी पुरामुळे फटका बसतो. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही, असा मुद्दा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुंबईतील पावसाळी अधिवेशनात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मांडला.
आ. भोंडेकर म्हणाले की, भंडारा विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी शिरते. यापैकी २२ गावांचे पुनर्वसन प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आले असून ते सध्या धूळ खात पडले आहेत. गेल्या अधिवेशनातही लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केला असता, मदत व पुनर्वसन मंत्री आशिष जयस्वाल यांनी बैठक घेऊन प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्षभरानंतरही त्यावर निर्णय झालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
खामारी येथील गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याची माहितीही आ. भोंडेकर यांनी सभागृहाला दिली. किमान मंत्रालयात पोहोचलेल्या २२ गावांच्या पुनर्वसनाबाबत तरी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.




