नागपूर, दि. 26 : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी शहर बस सेवेमध्ये असलेल्या डिझेल बसेसच्या ऐवजी आता ई-बसेस रस्त्यावर धावणार आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत सध्या डिझेलवर चालणाऱ्या बसेस सेवेतून काढून टाकल्या जाणार आहेत. ई-बसेस पर्यावरणपूरक बस असल्याने प्रदूषणात घट होणार आहे. येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यात एकूण ८५० ई-बसेस नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०२३ रोजी शहरासाठी ई-बसेसच्या देण्याची घोषणा केली होती. सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या डिझेलच्या बसेस काढून पर्यावरणपूरक व वातानुकुलित बसेस देण्याची योजना आखण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला. यामुळे एप्रिल २०२३ मध्ये राज्य सरकारकडून १३७ कोटी रुपयांचा निधी नागपूर महानगरपालिकेला मंजूर झाला आहे.
डिझेल बसेसचे निर्लेखन
२००९ मध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानअंतर्गत (जेएनएनयूआरएम) नागपूर महानगरपालिकेला डिझेलवर चालणऱ्या २४० बसेस मिळाल्या होत्या. या बसेसच्या खरेदीला १५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या बसेसचे निर्लेखन करण्यास सुरूवात झाली आहे.सध्या डिझेलवर चालणाऱ्या ७६ बसेस सेवेत आहेत. या बसेसचे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत निर्लेखन केले जाईल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव यांनी दिली. ई-बसेस सेवेत आल्यानंतर परिवहन विभागाच्या खर्चात कपात होणार आहे. बस चालविण्यासाठी येत असलेली तूट ४० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे श्री. विनोद जाधव यांनी सांगितले.
३० ई-बसेस सेवेत
राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून पहिल्या टप्प्यात नागपूर महानगरपालिकेला ३० ई-बसेस प्राप्त झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले. या बसेसचे नवा मार्ग निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पू्र्ण झाल्यानंतर येत्या १ जुलैपासून या बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. सध्या महानगरपालिकेत ४४५ बसेस सेवेत आहेत. यात ई-बसेस संख्या २१४ आहे. या बसेससाठी वाठोडा व खापरी येथे आगर (डेपो) बांधले जाणार आहे. या योजनेअंतर्गत उर्वरित ई-बसेस विविध टप्प्यांमध्ये नागपुरात दाखल होणार आहे. यात ९ मीटर लांबीच्या २३० ई-बसेस, १२ मीटर लांबीच्या २५० ई-बसेस मिळणार आहे. शहराच्या प्रवाशांसाठी नागपूर महापालिकेच्या ताफ्यात पुढील दोन वर्षात जवळपास ८५० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. या बससेच्या चार्जिंगसाठी लकडगंज भागात मातृशक्ती ई-डेपो उभारण्यात येणार आहे. पीएम श्री योजनामधून सुद्धा १५० बसेस नागपूरसाठी प्राप्त होणार आहे.
विमानतळावरून बस सेवा सुरू होणार
महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला ई-बसेस मिळत असल्याने विमानतळावर जाणाऱ्या किंवा विमानाने येणाऱ्या प्रवाशांना शहरात आणण्यासाठी ई-बस सेवा सुरू करण्यात येईल, असे परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव यांनी सांगितले. विमानांची ये-जा करण्याच्या वेळा लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या ई-बसेसची व्यवस्था प्रवाशांसाठी केली आहे. यामुळे विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना ई-बसेस जाण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी मार्ग निश्चित केला जात आहे.
नवे मार्ग निश्चित केले जाईल
ई-बसेसची संख्या वाढत असल्याने शहरात शहर बस वाहतुकीसाठी नवे मार्ग निश्चित केले जाणार आहे. तसेच सध्याच्या मार्गावर आवश्यकता असेल तेथे बसची अधिक वेळा सेवा पुरविण्यात येणार आहे. सध्या नागपुरात दररोज १ लाख ४० नागरिक बसने प्रवास करतात. यात वाढ करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. विनोद जाधव यांनी सांगितले.




