– ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये लेखनकौशल्यावर मार्गदर्शन
नागपूर :- इतर अनेक कौशल्यांसारखं लेखन कौशल्यही आपल्याला वाढवता येतं. नियमित लेखनाचा सराव केल्यास ते साध्य होतं. लेखनकौशल्यासाठी विविध प्रकारचे साहित्य वाचणे आवश्यक आहे. वाचनाशिवाय लेखनकौशल्य विससित करणे अवघड आहे. असे प्रतिपादन मुक्तलेखक, निवेदक, वक्ता सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केलं. जयताळा परिसरातील ज्ञानदीप इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित ‘लेखनकौशल्य’ कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक उमाकांत जिवतोडे होते. तर प्राचार्या माधवी शिंदे, उपप्राचार्या अनुराधा लोणारे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी विषयाच्या अनुषंगाने कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. बोलण्याचा किंवा लिहिण्याचा कुठलाच न्यूनगंड न ठेवता सुरुवात करावी. इतरांऐवजी स्वत:चे अनुभव व निरीक्षण नोंदवण्यावर त्यांनी भर दिला. विरामचिन्हे, प्रत्यय, जोडाक्षरे, वाक्यरचना अशा तांत्रिक बाजू त्यांनी सोप्या पद्धतीने शिकवल्यात. विद्यार्थांनी लिहून आणलेल्या विषयांतील गुणदोषांवर त्यांनी विस्तारानं चर्चा केली. विद्यार्थ्यांना लिखाणात नेहमी येणाऱ्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले. मराठीत एकजीव झालेल्या अरबी, फारसी, इंग्रजी, कानडी अशा अनेक भाषांतील शब्दांच्या गमतीजमती त्यांनी सांगितल्या. विद्यार्थ्यांना लेखनाच्या प्रात्यक्षिकांसह त्यातील विविध बारकावे स्पष्ट केलेत.
आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य माधवी शिंदे ह्यांनी विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य कार्यशाळेचं महत्त्व पटवून दिलं. अपवाद वगळता संपूर्ण शाळा ही स्त्रीशक्तीच्या गुणवत्तेचं मूर्तिमंत रूप असल्याचं त्या म्हणाल्यात. शाळेद्वारा आयोजित विविध शालेय व शालाबाह्य उपक्रमांची माहिती दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी आणि हिंदीतलेही तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना निरंतर मार्गदर्शन करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
शाळेचे संचालक उमाकांत जिवतोडे ह्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय शिक्षण हे विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं ते म्हणालेत. मराठी किंवा हिंदी आपली मातृभाषा असली तरी त्याचं शास्त्रशुद्ध ज्ञानार्जन करणं आवश्यक असल्याचं ते म्हणालेत. प्रशिक्षकांचा परिचय शिक्षिका प्रिया साकर्डे ह्यांनी करून दिला. मराठी विभागप्रमुख चेतना करडभाजने ह्यांनी कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून भूमिका सांभाळली. संचालन शिक्षिका सीमा रब्बेवार ह्यांनी केले, तर आभार शिक्षिका सुजाता लोखंडे ह्यांनी मानलेत. प्रश्नोतराच्या सत्राने कार्यशाळेची सांगता झाली.




