– चंद्रपाल चौकसे यांचे वनमंत्री नाईकांना निवेदन
– वनमंत्र्यांना सुचवलेल्या उपाययोजना
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- गेल्या काही वर्षांमध्ये अन्य वन्य प्राण्यांप्रमाणेच माणसांवरील वाघ-बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचे आपण अनुभवत आहोत, आदिवासीबहुल भागातील गावामध्ये सातत्याने घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष खूपच वाढलेला आणि हिंसक झालेला दिसत आहे. या वाढत्या संघर्षामुळे लोकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. वरवरच्या आणि तात्पुरत्या उपाययोजनांनी या समस्येवर कायमस्वरूपी मात करता येणार नाही, असे तज्ञांचे ठाम मत आहे. राज्यात सर्वत्र वाघ-बिबट्यांचे हल्ले का वाढत आहेत? त्यांना रोखण्यासाठी केले जाणारे उपाय कितपत पुरेसे आहेत? आणि मानव-वन्यजीव संघर्ष थांबवण्यासाठी नेमके काय करणे आवश्यक आहे? या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाचे) प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी वनमंत्री नाईक यांची भेट घेऊन बारा कलमी निवेदन सादर केले. आणि तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. वनमंत्र्यांनी यावर मंत्रालयात बैठक घेण्याची आश्वासन दिले.
वाघ आणि बिबट्याचा हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वाघाचे वास्तव्य असलेत्या भागातील पाच मुलांना मानधनतत्वावर ठेवावे. ते गावकऱ्यांना सचेत करतील. वन अधिकाऱ्यांना माहिती देतील, आरआरटी (टिम) ची मदत घ्यावी. व्याघ्रपीडित भागासाठी विभागीय पातळीवर चमू असावी. चमूमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असावे. गोरेवाडामध्ये १० वाघ राहतील इतकी जागा आहे, परंतु, तिथे २९ वाघ व २५ बिबट राहतील इतकी जागा आहे. तिथे आज ४० बिबट राहत आहे. गोरेवाड्यात जागेची क्षमता वाढवण्यासह विविध ठिकाणी बचाव केंद्र सुरू करावे, आरआरटी व पीआटी चमूमधील कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन व्हायला हवे. वॉटर होल कोअरमध्ये असावे. प्रादेशिक विभागाने गावाजवळील अनावश्यक वॉटर होल कमी करावे. कोअर एरिया समृध्द करून मुबलक पाणी साठ्यांची निर्मिती करावी. बफर क्षेत्रात गावाजवळ पाण्याचे होल करू नये. यामुळे वन्यप्राण्यांचा संचार कमी होईल. कापूस, ऊस व उंच पिकामध्ये वाघ व बिबट्याचा संचार अधिक असतो. एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे व्याघ्रपीडित भागात जास्त लावावे. यामुळे कंट्रोल रूममध्ये पीआर टीम (पाच मुले) यांना लगेच कळेल. एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. गावालगतच्या व्याघ्रपीडित क्षेत्राला कुंपण करावे. शेतीला कुंपणासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. वाघ व बिबट्यामुळे बरीचशेती पडीत झाली आहे. भीतीमुळे जेशेतकरी पीक आणू शकत नाही. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई किंवा शासनाकडून अनुदान स्वरूपात द्यावे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले शेतकरी व नागरिकांना २५ लाखाऐवजी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून वनमंत्र्यांकडे केली आहे.
वनमंत्र्यांची सकारात्मकता
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटी दरम्यान व्याघ्र हल्ल्यांबाबत चर्चा केली. सुचविलेल्या उपाययोजनेवर वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मकता दाखविली. याबाबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन चौकसेंना दिले.




