हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ सह शहरातील विविध भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रश्नी तातडीने तोडगा न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा इशारा नगरसेविका रोशनी विवेक भोंडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ३ आणि इतर प्रभागांमधील अनेक गल्ल्यांमध्ये पाईपलाईन असूनही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेच्या सभागृहात तसेच ‘जनता दरबारात’ तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्ष कृती शून्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मागण्या
🔹 शहरातील ज्या भागात पाणीपुरवठा खंडित आहे किंवा पाणी येत नाही, तिथे तातडीने उपाययोजना करून पुरवठा सुरळीत करावा.
🔹 सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, नवीन नळ कनेक्शन केवळ २ हजार रुपयांत उपलब्ध करून द्यावे.
🔹 पाईपलाईन किंवा इतर विकासकामांसाठी शहरात ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे, त्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रस्ते पूर्ववत करावेत.
हे निवेदन प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका रोशनी विवेक भोंडेकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) आणि जिल्हाधिकारी (भंडारा) यांनाही माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास येणाऱ्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा रोशनी भोंडेकर यांनी यावेळी दिला आहे.

