खापा, वार्ताहर :- खापा पोलिस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वाकी येथून वाहत असलेल्या कन्हान नदिच्या डोहात आजपर्यंत शेकडो निष्पाप जीव गिळंकृत करत अनेक आई-वडिलांचे स्वप्न व संसार उद्ध्वस्त केले असून आजपर्यंत या कन्हान नदीच्या डोहाने असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत.
अनेक तरुण-तरुणींनी पोहण्याच्या नादात या डोहात आपला जीव गमावला, अनेक आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबलेले नाहीत. आपल्या लेकराच्या आठवणीने त्यांचे हृदय आजही तुटते, त्यांच्या घरातील शांतता आजही त्या दुःखाची साक्ष देत आहे.
एक क्षणात हसते-खेळते घर उद्ध्वस्त होते, आईच्या कुशीतून मुलगा निघून जातो, वडिलांच्या आधाराचा हात कायमचा सुटतो… हे दुःख शब्दांत मांडणे अशक्य आहे.आजही अनेक माता आपल्या लेकराच्या आठवणीत रडतात, अनेक वडील मनात वेदना घेऊन जगत आहेत.![]()
सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाबा ताजुद्दीन यांच्या वाकी दरबाराजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीतील हा धोकादायक डोह अनेक निष्पाप जीवांचा बळी घेत आहे.आजवर शेकडो लोकांनी येथे आपला जीव गमावला असून, हा डोह मृत्यूचा सापळा बनला आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, भविष्यात आणखी कुणाच्या घराचा दिवा विझू नये, आणखी कुणाच्या आई-वडिलांना आपल्या लेकरासाठी अश्रू ढाळावे लागू नयेत, यासाठी हा डोह तातडीने बुजविणे अत्यंत आवश्यक आहे.याच भावनेतून हितज्योती आधार फाऊंडेशनच्या वतीने क्षेत्राचे आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांना विनंती निवेदन देण्यात आले.
आमदार डॉ. आशिषबाबू देशमुख यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत संबंधित विभागाशी बोलून योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी हितज्योती आधार फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, युवा समाजसेवी भुषण कुबडे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंढेले, जलतारा संयोजक मदन डहाके, निखिल पोटभरे, राजा फुले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी हितज्योती आधार फाऊंडेशनचे हितेश बनसोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले की एखाद्याच्या मृत्यूनंतर अश्रू ढाळण्यापेक्षा, वेळेवर उपाययोजना करून त्याचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे.व हीच भावना घेऊन हे निवेदन प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे बोलून दाखविले.