नागपूर :- भारतीय रिझर्व बँक ने दावा न केलेल्या ठेवी (अनक्लेम डिपॉझिट) ग्राहकांना परत मिळाव्यात यासाठी वर्षभर विशेष मोहीम राबवली. जनजागृती, ग्राहक शोध मोहीम आणि ‘उद्गम’ पोर्टलच्या माध्यमातून ५ हजार ४३ कोटी रुपये व्याजासह संबंधित ग्राहकांना परत करण्यात आले. मात्र, तरीदेखील ३१ मार्च २०२६ रोजी रिझर्व बँकेकडे तब्बल ८३ हजार ८७६ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
‘अनक्लेम डिपॉझिट’ म्हणजे नेमके काय?
बँकांमधील बचत खाते, मुदतठेव, चालू खाते किंवा इतर ठेव खात्यांमध्ये सलग दहा वर्षे कोणताही व्यवहार न झाल्यास ती रक्कम ‘अनक्लेम डिपॉझिट’ म्हणजे दावा न केलेली ठेव म्हणून वर्ग केली जाते. त्यानंतर ही रक्कम रिझर्व बँकेच्या ‘डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड’मध्ये जमा केली जाते. खातेदार किंवा त्यांच्या वारसांना नंतरही दावा करून ही रक्कम मिळवता येते.
विशेष मोहिमेत किती रक्कम परत मिळाली?
रिझर्व बँकेने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवली. जनजागृती जाहिराती, ग्राहक शोध मोहीम आणि ‘उद्गम’ (UDGAM) पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना विविध बँकांमधील निष्क्रिय खाती शोधण्याची सुविधा देण्यात आली. या मोहिमेमुळे ग्राहकांना व्याजासह ५ हजार ४३ कोटी १६ लाख रुपये परत करता आल्याचे माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले.
तरीही ८३ हजार कोटी रुपये अडकून का आहेत?
मोठ्या प्रमाणावर खातेदारांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संबंधित खात्यांची माहिती नसते. अनेक खात्यांमध्ये नामनिर्देशन केलेले नसते. त्यामुळे वारसांना दावा प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येतात. परिणामी मोठी रक्कम वर्षानुवर्षे निष्क्रिय राहते.
आणखी कोणती कारणे समोर आली?
जुने पत्ते, बदललेले मोबाईल क्रमांक, आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि स्थलांतर यामुळेही बँकांना खातेदार किंवा वारसदारांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरतेचा अभाव असल्याने अनेकांना स्वतःच्या नावावर जुनी मुदतठेव किंवा निष्क्रिय खाते असल्याची माहितीही नसते.
‘उद्गम’ पोर्टलची भूमिका काय?
रिझर्व बँकेने सुरू केलेल्या ‘उद्गम’ पोर्टलद्वारे ग्राहकांना विविध बँकांमधील निष्क्रिय खाती आणि ठेवी शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बँकांना एसएमएस, ई-मेल, जाहिराती आणि विशेष शिबिरांच्या माध्यमातून खातेदारांशी संपर्क साधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
तज्ज्ञ काय सांगतात?
बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक खातेदाराने सर्व बँक खात्यांमध्ये नामनिर्देशन करणे, खात्यांची माहिती कुटुंबीयांना देणे आणि खात्यांमध्ये नियमित व्यवहार सुरू ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यूनंतर किंवा दीर्घकाळ व्यवहार बंद राहिल्यास मोठ्या प्रमाणावर रक्कम निष्क्रिय खात्यांमध्ये अडकून राहते.