ग्राहकांना वेळेवर गॅस मिळावा आणि वितरणातील सर्व त्रुटी तत्काळ दूर व्हाव्यात, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री अत्यंत आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले.
नागपूर :- गॅस, डिझेलच्या पुरवठ्यावरून गोंधळाची स्थिती आहे. ग्राहकांना त्रास होत असल्याचे चित्र आहे. पुरवठा वाढल्यानंतरही ग्राहकांना रांगेतच उभे राहावे लागत असल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त करीत गॅस कंपन्या, गॅस एजन्सी, पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रोलपंप चालकांकडून सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यामुळे धारेवर धरले.
ग्राहकांना वेळेवर गॅस मिळावा आणि वितरणातील सर्व त्रुटी तत्काळ दूर व्हाव्यात, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते अत्यंत आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्राहकांना ‘संदेश’ देण्याची जबाबदारी कंपन्या का पार पाडत नाहीत?
शासनाने या वितरण व्यवस्थेत वेळोवेळी सुधारणा केली, जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेऊन स्पष्ट निर्देश दिले. एवढे सगळे होऊनही ग्राहकांना वेळेवर एक साधा ‘संदेश’ पोहोचवण्याची जबाबदारी कंपन्या का पार पाडत नाहीत, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केला. त्यांनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि इतर कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना धारेवर धरले.
अजूनही रांगा का लावाव्या लागत आहे?
गॅस वितरणातील त्रुटी दूर करून ग्राहकांना अधिकाधिक तत्पर सेवा देणे ही गॅस एजन्सी चालक आणि कंपन्यांची प्राथमिक जबाबदारी असायला हवी. मात्र, आजच्या घडीला गॅस एजन्सींकडून ग्राहकांना गॅस उपलब्धतेबाबत कोणतेही संदेश दिले जात नाहीत. दुसऱ्या बाजूला कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा वाढवला असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र लोकांना अजूनही रांगा का लावाव्या लागत आहेत, अशी विचारणा पालकमंत्र्यांनी केली.
त्या सक्तीवर आक्षेप
ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना पालकमंत्री बावनकुळे यांनी पेट्रोलपंप चालकांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर मोठी अवजड यंत्रसामग्री कार्यरत असते. या सर्व वाहनांना आणि यंत्रांना डिझेल भरण्यासाठी थेट पेट्रोलपंपावर येण्याची सक्ती केली जात असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला.