हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुकुंद साखरकर यांची निवड होताच जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. पण या उत्साहात आणखी भर पडली ती एका फोनमुळे! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून मुकुंद साखरकर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिल्लीहून थेट राहुल गांधींचा फोन आल्याने सध्या भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात फक्त याच फोनची चर्चा रंगली आहे.
२३ मे रोजी शनिवारच्या सकाळला साधारण ११ वाजता मुकुंद साखरकर यांना फोन आला. पलीकडून “राहुल गांधी आपल्याशी बोलणार आहेत,” असा निरोप मिळाला आणि काही क्षणांतच राहुल गांधींचा आवाज ऐकू आला. मुकुंद साखरकर यांच्यासाठी हा अनुभव सुखाचा धक्का देणाराच होता.
राहुल गांधी काय म्हणाले? राहुल गांधींनी अतिशय आपुलकीने साखरकर यांची चौकशी केली. ते म्हणाले, “मुकुंदजी, तुमची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन! पक्ष मजबूत करण्यासाठी आता कंबर कसा. जुन्या-नव्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चाला. प्रत्येकाचा आदर राखा. माझ्या मदतीची गरज लागल्यास दिल्लीचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी उघडे आहेत.”
बाबासाहेबांच्या आठवणीला दिला उजाळा
या संभाषणात राहुल गांधींनी भंडाऱ्याच्या मातीचा उल्लेख करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला. राहुल गांधी म्हणाले, “भंडारा जिल्हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच जिल्ह्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष पाहिला आहे, त्यांनी इथून निवडणूक लढवली आहे. अशा ऐतिहासिक जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा आणि सामाजिक न्यायाचा विचार घराघरात पोहोचवा.”
कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात काँग्रेसला एका खंबीर आणि तरुण नेतृत्वाची गरज होती. मुकुंद साखरकर यांच्या रूपाने ती उणीव भरून निघाली आहे. त्यातच आता खुद्द राहुल गांधींनी दखल घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा संचारली आहे. आगामी काळात जिल्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार, अशे चित्र आता दिसू लागली आहेत.