प्रतिनिधी, भंडारा :- जिल्ह्यातील बेला व खरबी ग्रामपंचायतीने विकासाच्या दिशेने टाकलेली पावले आता प्रशासकीय पातळीवरही चमकू लागली आहेत. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत’ नियुक्त करण्यात आलेल्या विशेष मूल्यांकन पथकाने १ जुन रोजी भंडारा पंचायत समिती अंतर्गतच्या बेला व खरबी गावाला भेट देऊन येथील विकासकामांची आणि प्रशासकीय पारदर्शकतेची कडक तपासणी केली.
गावांच्या सर्वांगीण विकासाचा मोजमाप करण्या साठी आलेल्या या चमूमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात समितीचे अध्यक्ष तथा वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत आत्माराम बोंद्रे, पाणी व स्वच्छता समीतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, वृत्तपत्र प्रतिनिधी यशवंत हिवराळे, विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे, प्रफुल्ल इटाळ, उज्वल पुरी, रंजीत राऊत यांचा समावेश होता
या टीमने केवळ कागदपत्रांचीच नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, डिजिटल सुविधा आणि महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या प्रत्यक्ष कामांची ‘ऑन ग्राउंड’ पाहणी केली.
बेला ग्रामपंचायतीच्या सरपंच. शारदा शेंडे,यांनी पथकासमोर गावाच्या प्रगतीचा पाढा वाचला. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावाने स्वच्छता, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये कशी झेप घेतली, याचे सादरीकरण त्यांनी केले.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान केवळ कामांचे मूल्यमापनच झाले नाही. यामुळे गावात एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी भंडारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद हुमने,विस्तार अधिकारी प्रमोद तिडके, ग्राम पंचायत अधिकारी विलास खोब्रागडे,उपसरपंच अर्चना कांबळे,सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका आखरे, आरोग्य सेविका वैशाली ठवकर,मुख्याध्यापक महेंद्र केंद्रे, अंगणवाडी सेविका मंदा बोरकर,आशा सेविका वनीता तितरमारे, कृषी सहाय्यक प्रविण पडघान, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या या दौऱ्यामुळे बेला ग्रामपंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, इतर ग्रामपंचायतीं साठी बेला हे आता एक ‘रोल मॉडेल’ ठरत आहे



