नागपूर :- भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली आणि ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथे सुरेशभट सभागृहात भव्य लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध लोक कला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या या स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन अँड. प्रकाश जायसवाल (अध्यक्ष, जिल्हा विधिवत संघटना नागपूर), सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी सुधा इरसकर, नगरसेविका सारिका सुनील नांदुरकर (महिला व बालकल्याण समिती, माजी सभापती मनपा नागपूर), ज्योतिषाचार्य महामंडलेश्वर रविंद्र खरे, समाजसेविका व ‘म्युझिक अँड मी’च्या संचालिका शालिनी सिन्हा, विशाल खोत (विशाल मेडिकोज), नृत्यदिग्दर्शक शरद बारापात्रे (तेजस डान्स अकॅडमी), कृणाल नवले, रश्मी नवले, श्रीमंतयोगी नाट्य शृंगार (कोरिओग्राफर) तसेच ‘लावणी क्वीन’ शिल्पा शाहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
स्पर्धेत गोंधळ, मावळे, जोगवा, वाघ्या-मुरळी, शिवतांडव, देशभक्तीपर नृत्य, लावणी, कालबेलिया, शेतकरी, आदिवासी, कथ्थक, पंजाबी भांगडा, कोळी नृत्य तसेच विविध सांस्कृतिक वेशभूषांवर आधारित आकर्षक लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. सहभागी कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट नृत्याविष्कारातून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कृणाल नवले, रश्मी नवले, श्रीमंतयोगी नाट्य शृंगार, शरद बारापात्रे (तेजस डान्स अकॅडमी), यशवंत शाहीर आणि शिल्पा शाहीर यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या निकालात गरबा नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकासाठी तांडव (रश्मी ग्रुप) आणि गोंधळ (सागर ग्रुप) यांना समान गुण मिळाल्याने संयुक्तपणे गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक मावळे नृत्य (पांडव ग्रुप) आणि राजस्थानी नृत्य (रोशन ग्रुप) यांना समान गुणांमुळे संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका सौ. शालिनी सक्सेना, कल्पना फुलबांधे, आनंद सक्सेना, अक्षय सक्सेना, प्रियंका अक्षय सक्सेना आणि शरद बारापात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी सहभागी कलाकारांचे कौतुक करत भारतीय लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.







