नागपूर :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापनेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, माई फाउंडेशन आणि माई ग्रुप, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर पार्क, मनीषनगर (बेसा) येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदूहृदयसम्राट डॉ. प्रवीण तोगडिया यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल या संघटनांनी गेल्या आठ वर्षांत सबरीमला आंदोलन, २०१८ मधील लखनौ ते अयोध्या राममंदिर आंदोलन, कोरोना काळात ५०० हून अधिक अन्नछत्रांचे आयोजन, २५ लाख मास्कचे वितरण, प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये कोट्यवधी भाविकांसाठी मोफत भोजन व निवास व्यवस्था, महिला सुरक्षा, सन्मान, समृद्धी आणि रोजगार यांसारखी अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत. सध्या देशातील ४६५ जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या शाखा कार्यरत असून ५ लाख हनुमान चालीसा केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. देशभरात सध्या २५ हजारांहून अधिक हनुमान चालीसा केंद्रे कार्यरत आहेत. या कार्याच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला माई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी, सचिव ॲड. रूबी चौधरी, माई ग्रुपचे अधिकारी प्रकाश बघेले, अध्यक्ष विजय पटले, माई ग्रुपचे सहयोगी प्रा.सुरेंद्र मोरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विठ्ठल कोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात योग प्रशिक्षक रूबी चौधरी यांच्या मार्गदर्शनात झाली. त्यांनी सांध्यांचे व्यायाम, वॉर्म-अप, सूर्यनमस्कार तसेच ताडासन, चक्रासन, सर्वांगासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, मनमंदिरासन यांसारख्या विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम- विलोम, भ्रामरी, उज्जयी आणि ओंकार यांसारख्या प्राणायाम प्रकारांचे मार्गदर्शन करून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. समारोपप्रसंगी डॉ. मोतीलाल चौधरी, विजय पटले, विठ्ठल कोटावार आणि ॲड. रूबी चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व आणि योगाचे आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. उपस्थितांचे आभार मानून अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये कृष्णा तळेगावकर, गजेंद्र भांडे, निलेश बोपचे, अथर्व चौधरी, राहुल क्षीरसागर, सुभाष पटले, उर्मिला पटले, वैद्यजी, पूनम नले, संतोष भगत, सुनील चने, प्रदीप नले, हीरालाल पराडकर, ताजने, तोलीराम तुरकर, विनायक लांजेवार, विजय वर्मा आदींचा समावेश होता. यशस्वीतेसाठी मल्हारी बुधनार आणि राहुल हिंगे यांचे विशेष योगदान लाभले.




