मुंबई :- नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य परिणय फुके यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, पाणी गुणवत्ता तपासणी, पाईपलाईन दुरुस्ती, जलशुद्धीकरण व्यवस्था आणि वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात येतील. तसेच पर्यावरण विभागालाही दूषित पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील. संबंधित कंपनीने करारातील अटींची पूर्तता केली आहे का, याची सखोल पडताळणी केली जाईल. अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कंपनीविरुद्ध कराराचा पुनर्विचार किंवा आवश्यक ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नावर नागपूर शहरातील आमदारांची समिती स्थापन करून सविस्तर अभ्यास केला जाईल. नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, कोणत्याही रहिवाशावर अन्याय होणार नाही याची शासन पूर्ण काळजी घेईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.




