हंसराज, भंडारा :- NEET, MPSC आणि TET परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यातील तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. या परीक्षा घोटाळ्यांचा निषेध करण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी फाळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे सत्र सुरू आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. या आंदोलनाची पूर्वतयारी ३० जून रोजी जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील सातही तालुक्यातून शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. वारंवार होणाऱ्या या घोटाळ्यांमुळे सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
• विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारदर्शक परीक्षा पद्धत लागू करावी.
• सर्व भरती प्रक्रियांसाठी सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरावी.
• पेपरफुटीमधील दलालांवर कठोर कारवाई करून जलदगती न्यायालयात खटले चालवावेत.
• वारंवार होणाऱ्या परीक्षा घोटाळ्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश हटवार, अजय मेश्राम, दालचंद देशमुख, यशवंत तिडके, रवी तिडके, मधुकर चौधरी, राहुल बडवाईक, हेमराज सिदपुरे, घनश्याम वंजारी, विशाल खडाळकर, अशोक मुरकुरे, ममता खोडपे, कोमल भिवगडे, मंगेश खोडके, योगेश्वर वाडीभस्मे, चंद्रशेखर भिवगडे, बालचंद पाटील, मिताली खांडाईत, करुणा राऊत, लता बावनकुळे, शाहिना राजा खान, विजय रिनाईत, अजय साठवणे, भूषण आंबिलकर, आर्यन वासनिक यांच्यासह शेकडो विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.
परीक्षेतील पारदर्शकता जोपर्यंत सुनिश्चित होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.




