यवतमाळ :- राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, लाभ वितरणासाठी शासन यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी ‘महाकर्जमुक्ती योजना’ म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. विविध बँकांकडून प्राप्त झालेल्या पात्र कर्जदारांची माहिती, ई-केवायसी, आधार पडताळणी आणि खात्यांची अंतिम छाननी यासह सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्णत्वास येत आहेत. संबंधित विभाग, बँका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय साधून लाभ वितरणाची तयारी वेगाने सुरू आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे राष्ट्रीयकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इ. कडून घेतलेल्या पात्र पीककर्जधारकांना लाभ मिळणार आहे.
शासनाने शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, ई-केवायसी आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. पात्रतेबाबत किंवा कर्जमुक्ती प्रक्रियेविषयी कोणतीही अडचण असल्यास संबंधित बँक शाखा अथवा कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारणाची सक्षम व्यवस्था उभारली आहे. कर्जखात्याची माहिती, आधार संलग्नता, बँक तपशील किंवा लाभार्थी पात्रतेसंदर्भात कोणतीही तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचण उद्भवल्यास शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण व्हावे यासाठी जिल्हास्तरीय विशेष तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून, संबंधित प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेण्यात येणार आहेत.




