नागपूर :- प्रख्यात आध्यात्मिक गुरु, समाजसेविका, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरणादायी वक्त्या राजलक्ष्मी मांदा यांच्या नागपूर आगमना निमित्त भारतीय जनता पार्टी – दक्षिण भारतीय आघाडी, नागपूर महानगरच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील रविभवन येथे सायंकाळी 5:30 वाजता. त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून भव्य सत्कार करण्यात आला. वाराणसीहून आलेला त्यांचा ताफा रविभवनात पोहोचला. या स्वागत समारंभाला महाराष्ट्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, नागपूर महानगरपालिकेच्या बांधकाम व नियोजन समितीच्या सभापती अश्विनी जिचकार, नगरसेवक श्रीकांत आगलावे, साऊथ इंडिया असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष के. जगदीशन, तसेच भाजप दक्षिण भारतीय आघाडी, महाराष्ट्रचे विदर्भ विभाग संयोजक अमित गोविंद मुदलियार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजप दक्षिण भारतीय आघाडी, नागपूर महानगरचे अध्यक्ष विनोद नायडू, महासचिव विजयराणी रेड्डी, टी.ए.जोसेफ, वसंत मुदलियार, त्रिमूर्ती राव, योगेश पिल्लै, सुमित गुप्ता यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारा नंतर माँ राजलक्ष्मी मांदा यांनी उत्तर प्रदेशातील भदोही येथील सुंदरवन परिसरात उभारण्यात येत असलेल्या ‘श्री द्वादश ज्योतिर्लिंग संगम क्षेत्र -श्री राम जानकी मंदिर’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असलेले १८० फूट उंच व १५०.३ फूट रुंद जगातील सर्वात मोठे शिवलिंगाकार मंदिर हे सनातन धर्माच्या जागतिक प्रचार- प्रसाराचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सनातन धर्म, भारतीय संस्कृती आणि प्राचीन परंपरांचा प्रसार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन सामाजिक व आर्थिक उन्नतीलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धर्मसंरक्षणासोबतच समाज सशक्त करण्याचे कार्य हा प्रकल्प करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२७ च्या मध्यापर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर भव्य कुंभाभिषेकम् सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी माँ राजलक्ष्मी मांदा यांनी नागपूरकरांनी प्रत्येक भेटीत दिलेल्या प्रेम, सन्मान आणि आपुलकी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सनातन धर्माच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी महिलांनी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. शेवटी भाजप दक्षिण भारतीय आघाडी, नागपूर महानगरचे अध्यक्ष विनोद नायडू यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व पाहुण्यांचे आभार मानले. यानंतर माँ राजलक्ष्मी मांदा यांनी धंतोली येथील राष्ट्र सेविका समितीच्या मुख्यालय अहिल्या मंदिर येथे जाऊन समितीच्या प्रमुख संचालिका व. शांताकुमारी (शांताक्का) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी तेथेच रात्री मुक्काम केला. नंतर बुधवारी ८ जुलै रोजी सकाळी पहाटे 5 वाजता. त्यांचा ताफा पुढील प्रवासासाठी हैदराबाद कडे रवाना झाला.




