– मंत्रोपचार बेतू शकतो जीवावर
– माहिती व जनसंपर्क विभागातर्फे संवाद
नागपूर :- पाऊस पडल्यामुळे साप बाहेर येण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंश झालाच तर वेळ न घालवता रुग्णालयात जाऊन उपचार घेतले तर जीव वाचू शकतो, मात्र मंत्रोपचारात वाया जाणारा वेळ जीवावर बेतू शकतो, असे प्रतिपादन वाईल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीचे सचिव व सर्पमित्र नितेश भांदक्कर यांनी केले. संचालक (माहिती व जनसंपर्क) कार्यालयातर्फे आयोजित संवाद उपक्रमात ते बोलत होते.
देशात दरवर्षी सर्पदंशामुळे दीड ते दोन लाख लोकांचा मृत्यू होतो असे सांगून भांदक्कर म्हणाले की, पुरेशी खबरदारी घेतली तर हा मृत्यू टाळता येऊ शकतो. नागपूर परिसरात सापाच्या २५ ते ३० प्रजाती आढळतात मात्र त्यापैकी नाग, घोणस, मण्यार व फुरसे या चार प्रजाती विषारी आहेत.
सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयात डॉक्टर रक्ताची चाचणी करतात, मात्र काही सापांचे विष रक्तात आढळत नाही. नाग हा त्यपैकीच एक साप आहे. मण्यार हा नागापेक्षाही विषारी साप आहे. हा साप चावला तर मुंगी चावल्यासारखे वाटते, त्यामुळे लगेच लक्षात येत नाही आणि लक्षणेही उशिरा दिसतात. पोटात कळा, छातीत धडधड, जीभ जड होणे, गिळताना त्रास, श्वास घ्यायला त्रास अशी मण्यारच्या दंशाची लक्षणे असतात. घोणस साधारणतः शेतात आढळतो. या सापाचे विष रक्ताला पाण्यात रुपांतरित करते. याच्या दंशाने किडनीवर परिणाम होतो. फुरसेच्या दंशानंतर डोळे व तोंडातून रक्त येते, अशी विषारी सापाच्या दंशानंतरची लक्षणे त्यांनी यावेळी संगितली.
जमिनीवर झोपू नका, झोपावेच लागले तर मच्छरदानी लावा, शरीराला जिथे सर्पदंश झाला त्या ठिकाणी आवळून पट्टी बांध नूका, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
साप चावल्यावर बरेचजण बुवाबाजीकडे जातात. मात्र त्यात वेळ न घालवता वेळीच रुग्णालयात नेऊन उपचार केले तर रुग्णाचा जीव वाचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी भांदक्कर यांचे स्वागत केले. आभार सहायक संचालक पल्लवी धारव यांनी मानले.




