– प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेटचे सुरक्षाकवच !
– माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून समाजसेवा आणि रस्ते सुरक्षेचा प्रेरणादायी संदेश !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- समाजासाठी जगण्याची आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्याची भावना जोपासणारा एक प्रेरणादायी उपक्रम डोंगर यावली येथे उत्साहात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १९५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून त्यांना मानवतेची खरी श्रद्धांजली अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
या उपक्रमाने केवळ रक्तदानापुरतेच मर्यादित न राहता समाजाला जीवनमूल्यांचा संदेश दिला. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एखाद्याला नवजीवन मिळू शकते, या भावनेतून युवक, महिला आणि विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात अनेकांनी प्रथमच रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव कृतीतून दाखवून दिली.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला मोफत हेल्मेटचे सुरक्षाकवच भेट देण्यात आले. माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाने रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षेचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. “रक्तदान करून दुसऱ्याचे जीवन वाचवा आणि हेल्मेट वापरून स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवा,” हा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. उपस्थितांनी रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून, ती मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याची भावना व्यक्त केली.
या उपक्रमामुळे स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना सामाजिक कार्याच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. समाजहिताचे उपक्रमच खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या कार्याला जिवंत ठेवतात, याची प्रचिती या कार्यक्रमातून आली. रक्तदान आणि रस्ते सुरक्षा या दोन महत्त्वाच्या विषयांची प्रभावी सांगड घालत डोंगर यावलीने संपूर्ण तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, सर्व रक्तदाते आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातही अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.





