– महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम
– महागायक साजन बेंद्रे यांच्या गीतांनी रंगली संगीतसंध्या
नागपूर :- साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिके च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अण्णाभाऊ साठे व भीमगीतांचा संगीतमय गीतांचा भव्य जल्लोष’ या कार्यक्रमाला नागरिक व समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेशभट सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक साजन बेंद्रे यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी, माजी महापौर तथा भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, दुर्बल घटक समितीच्या सभापती लक्ष्मी हत्तीठेले, नगरसेवक श्रीकांत आगलावे तसेच भाजपा नागपूर शहर महामंत्री संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने आयोजित या संगीत कार्यक्रमात अण्णाभाऊंच्या कार्याची तसेच सामाजिक समतेच्या विचारांची आठवण करून देण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, श्रमिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. महागायक साजन बेंद्रे यांच्या दमदार सादरीकरणामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करणारी गीते तसेच भीमगीतांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. गीतांच्या तालावर उपस्थितांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला महेंद्र प्रधान, रमेश पाडण, लहानु इंगळे, नानाजी प्रधान, महेश खोडके,सागर जाधव, रविंद्रन खडसे, अंकुश बावणे, बंटी भाऊ इंगळे, संजय सोनटक्के, कृष्णा खोडके, रवींद्र खडसे, अंकित चन्ने, रोशन ठोसर, संजय ठोसर, राजेश डोंगरे, राजू सोरगिले, प्रभूदास तायवाडे, खरेजी, भारती कांबळे, बुधाजी सुरकर, यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे नागपूरमध्ये सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले. समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. अण्णाभाऊंच्या विचारांना सांस्कृतिक माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.





