कुही :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आज वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी सभापती सुधाकर कडव, शाळेचे मुख्याध्यापक भगवान पाटील, तसेच नेहा ठाकरे, हेमराज आतीलकर, दुर्योधन राघोर्ते, बंडू कडव, चंद्रशेखर लांजेवार, बालाजी भेंडे व गोदरु मेश्राम यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार व निरोगी वातावरण निर्माण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्येही वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
शाळेच्या परिसरात झालेल्या या वृक्षारोपणामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा मिळणार आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात आला.





