कामठी :- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजू लाभार्थ्यांना स्वस्त दरात मिळणाऱ्या गहू-तांदळाच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. शासनाकडून लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या धान्याची खरेदी-विक्री, साठेबाजी अथवा अन्य व्यक्तीकडे हस्तांतरण केल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा तहसीलदार गणेश जगदाळे यांनी प्रसिद्दपत्रकातून दिला आहे.
शासकीय योजनेतील धान्य हे गरजू लाभार्थ्यांच्या हक्काचे आहे. मात्र, धान्य दुकानातून उचललेले गहू-तांदूळ काही ठिकाणी व्यापाऱ्यांना विकले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, शासकीय धान्य विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. लाभार्थ्यांकडून स्वस्त दरातील धान्य खरेदी करून त्याची साठेबाजी अथवा पुढे विक्री करणाऱ्यांवरही नियमानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे ‘
शासकीय धान्याचा गैरवापर, अनधिकृत हस्तांतरण किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात येणार आहे. लाभार्थी असो वा व्यापारी—शासकीय धान्याच्या गैरव्यवहारात सहभागी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी भूमिका तहसील प्रशासनाने घेतली आहे.
तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या या इशाऱ्यामुळे कामठी तालुक्यातील धान्य व्यवहारांकडे आता प्रशासनाची विशेष नजर राहणार असून, गरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात प्रशासनाची कारवाईची मोहीम अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.





