– आंतरशालेय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- रोटरी क्लब ऑफ नागपूर व प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. तीन दिवसीय या स्पर्धेत शहरातील ३१ शाळांमधील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडू माती, नैसर्गिक रंग व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभास प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, एनआयटी नागपूरचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर प्रशांत भांडारकर, चित्रकला महाविद्यालयाचे प्रोफेसर व परीक्षक संजीव जठार, अजय रायबोले, रोटरी क्लब एलिटच्या प्रेसिडेंट स्वप्ना नायर, माजी अध्यक्ष ममता जयस्वाल, शाळेचे उपाध्यक्ष भालचंद्र कागभट तसेच रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत कला, सृजनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश दिला. परीक्षक अजय रायबोले व संजीव जठार यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. गट ‘अ’मध्ये देवांशी असकार (सरस्वती विद्यालय) प्रथम, अहान चौहान (बी.के.व्ही.व्ही. स्कूल) द्वितीय तर रौनक चंद्रशेखर (राही सेंट्रल स्कूल) तृतीय ठरले. पंखुडी सिंग, पायल चांदपुरकर व कव्यांशा धापोडकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाला. गट ‘ब’मध्ये हर्ष टोंगे (हडस हायस्कूल) प्रथम, ओझल बेदबावरे (सीडीएस स्कूल) द्वितीय आणि रोशन भुसारे (सोमलवार हायस्कूल, रामदास पेठ) तृतीय ठरले. साची रानदिवे, इशिका भोंडे व स्वरा बनिया यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. गट ‘क’मध्ये दीता अकनुरवार (हडस हायस्कूल) प्रथम, श्रावणी कालेश्वर (राजेंद्र हायस्कूल, महाल) द्वितीय तर सायली बिसेन (राही पब्लिक स्कूल) तृतीय ठरल्या. गौरव बांदे, आरव कनोजिया व नजर वरखडे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाले. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे विशेष कौतुक करत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, असेही त्यांनी नमूद केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीता चौधरी यांनी केले. उपस्थितांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन करून कार्यक्रमाची सांगता केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली भुसारी व मंजुषा वैरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.





