वर्धा १३ – अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करत १.२२२ किलोग्रॅम गांजासह एकूण १ लाख ३९ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी रात्री हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे रिमडोह (हिंगणघाट) परिसरात सापळा रचून गणेश अनिल चिताडे (वय २७, रा. विठ्ठल मंदिर वार्ड, टिळक चौक, हिंगणघाट) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तो एमएच ३२ एव्ही ७८७६ क्रमांकाच्या दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गांजा, मोपेड आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला आणि जप्त मालाला पुढील कार्यवाहीसाठी हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पीएसआय प्रकाश लसुंते, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर आणि अभिषेक नाईक यांच्या पथकाने केली.




