यवतमाळ, दि. २८ : भारतीय टपाल विभागाने जनतेच्या सेवेत आणखी एक क्रांतिकारक टप्पा गाठण्याचा निर्णय घेतला आहे. आता एपीटी प्रणालीच्या माध्यमातून टपालसेवा अधिक जलद, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होणार आहे. एपीटी अर्थात अॅडव्हान्स पोस्टल टेक्नोलॉजी प्रणाली दि.५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सर्व शाखा व उपशाखा टपाल कार्यालयांमध्ये कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे २ व ३ ऑगस्ट रोजी आवश्यक माहिती स्थलांतराच्या कामासाठी सर्व टपाल व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
या नव्या यंत्रणेमुळे टपाल व्यवहार डिजिटल माध्यमातून अचूकपणे ट्रॅक होणार असून, पॅकेजेसची गती व स्थिती सहज समजेल. ग्राहकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. प्रणालीच्या कामकाजामुळे नागरिकांनी अत्यावश्यक टपाल कामकाजाची पुर्तता दि.२ ऑगस्टपूर्वीच करावी, असे आवाहन केल आहे.
एपीटी अर्थात अॅडव्हान्स पोस्टल टेक्नोलॉजी प्रणालीमुळे टपाल व्यवहार अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक होणार असून ही सुधारणा सामान्य जनतेच्या सोयीसाठी उचललेले एक सकारात्मक पाऊल आहे, असे याबाबत माहिती देताना यवतमाळचे डाक अधीक्षक मोहन निकम यांनी सांगितले.




