– डॉ. आशिष देशमुख काय भूमिका घेणार?
सावनेर प्रतिनिधी :- विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुहेरी पार्श्वभूमीवर सावनेरचं राजकारण तापलं आहे. गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी नगर परिषद मैदानावर होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. यामध्ये भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख हे मुख्य आकर्षण ठरणार असून, त्यांच्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांची दिशा कितपत स्पष्ट होणार? याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
डॉ. देशमुख राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती, नागपूर जिल्ह्याचं राजकारण, सावनेर–कळमेश्वर विकास या मुद्द्यांवर प्रखर विचार मांडतील अशी अपेक्षा आहे. मात्र खरी उत्सुकता आहे ती —
ते काँग्रेसमधून आलेल्यांना जास्त महत्त्व देतात का? की वर्षानुवर्षे पक्षाशी निष्ठा दाखवणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देतात?
मेळाव्याला डॉ. राजीव पोतदार, पियुष बूरडे, रामराव मोवाडे, मंदार मंगळे, तेजस्विनी लाड, रितेश सूर्यवंशी यांसारखे मान्यवर हजेरी लावणार असून, पक्षाची ताकद दाखवण्यासाठी मोठा जमाव जमणार आहे.
मुख्य प्रश्न :
• या मंचावरून भावी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे चेहरे उघड होतील का?
• भाजपमधील नाराज गट यावेळी उघडपणे समोर येईल का?
• काँग्रेसमधील नाराजीला देशमुख कोणती दिशा देतात?
• आणि सगळ्यात मोठं — सावनेरमध्ये सुनील केदार विरुद्ध आशिष देशमुख ही थेट लढत किती तीव्र होते?
तज्ज्ञांच्या मते, आजचा मेळावा फक्त सांस्कृतिक सोहळा नाही, तर भविष्यातील राजकारणाचा रोडमॅप ठरणार आहे.
यंदा सावनेरच्या दसऱ्याला फटाके फक्त आकाशात नाही, तर राजकीय रंगमंचावरही फुटणार, यात शंका नाही!




