कामठी :- आरोग्य विभागाच्या वतीने कामठी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठी च्या वतीने सिकलसेल मुक्तीसाठी कामठी शहरात 15 जानेवारी पासून अरुणोदय जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये सिकलसेल आजाराबबत जनजागृती तसेच सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरॉसीस,एचपीएलसी तपासणी ,मोफत औषधी व समुपदेशन करण्यात येत आहे.तेंव्हा या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.
यामध्ये सिकलसेल आजराची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना नियमित तपासणी,मोफत औषधी,समुपदेशन , गरजेनुसार रक्त संक्रमण तज्ञाचा सल्ला आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत.सिकलसेल आजाराचे लवकर निदान,रुग्णांना योग्य उपचार, निदान व संदर्भ सेवा उपलब्ध असून सुरू असलेल्या अरुणोदय मोहिमेतून शहरात किती सिकलसेल रुग्ण आहेत हे स्पष्ट होईल.
-सिकलसेल अनुवांशिक आजार,तपासणी महत्वाची
-हा आजार अनुवंशिक असून आई वडीलापासुन अपत्यांना होतो.सिकलसेल प्रतिबंधासाठी योग्य तपासण्या करून घेणे गरजेचे आहे कींवा सिकलसेल ग्रस्त किंवा वाहक व्यक्तीने निरोगी व्यक्तीशी विवाह करावा असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
– सिकलसेल ग्रस्तांना मिळतात हे लाभ
– सिकलसेल ग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तसेच विद्यार्थ्याना परिक्षेच्या वेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ मिळतो,उपचारा दरम्यान प्रवासात बस गाडीत सवलत मिळते अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात आले आहे या जनजागृती मोहिमेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कामठी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.




